डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे
आर्थिक साहित्याचे अध्ययन करणे एक महाकठीण काम आहे. परंतु त्याहून जास्त कठीण काम
म्हणजे त्यामधील तात्विक सिद्धांताना अचूकपणे जसेच्या तसे समजून घेणे आहे. या बाबत
त्यांनी भारतीय विध्यार्थ्यांना सतर्क केलेले आहे. जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर
आपल्या The Evolution of Provincial Finance in British India या ग्रंथाच्या
भूमिकेमध्ये लिहितात “येणाऱ्या अनेक काळापर्यंत विध्यार्थी भारतीय वित्तावर किंवा
अर्थशास्त्रावर अध्ययन सदर न करू शकल्यामुळ नेहमीच माफी मागण्याच्या अपमानापासून
तर आता बचावले जातील, परंतु दुसऱ्या बाजूने मला भीती आहे. तेवढ्याच अनेक
काळापर्यंत त्यांना त्यांच्या या संबंधात संशोधनातील तृटीकरिता माफी मागण्याची
पाळी मात्र येवू शकेल.”
ह्या देशातील विषम मानसिकते
मूळ आणि बौद्धिक प्रमानिकातेच्या अभावात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वच
प्रकारच्या प्रतिमांना धक्के लागत आहेत, त्यात आंबेडकरी साहित्य वाचक बहुधा
त्यांना प्रज्ञावन्ताच्या उल्लेखाने नोंदवून,विषय मर्माकडे व विषय उद्देशाकडे
दुर्लक्ष करताना दिसून येतात. आजच्या २१व्या शतकाच्या उंबरठयावर सर्वसामान्य माणूस
नव्हे तर शिकलेली माणसेसुद्धा डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या विचाराना सकारात्मक
दृष्टीने पाहण्याची मानसिकता ठेवीत नाहीत. सर्वसामान्य माणूस आपल्या कौटुंबिक
पालनपोषण व्यस्त आहे. धनवान, विद्वान आणि नेते मंडळी आपल्या पैसा व पदप्राप्तीच्या
प्रकल्पामध्ये व्यस्त आहेत. देशातील शासकीय अधिकारी वर्ग देशाच्या समस्या अंगावर
आल्या तेवढ्या, वेळ काढून टाकण्याच्या पद्धतीने हाताळत आहेत. अशा वेळी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय विचारांचा पाठपुरावा देशाला
मार्गदर्शक ठरू शकतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण अर्थशास्त्रीय चिंतन
राष्ट्रवादाचा उद्घोष करते. भारतीयांच्या राष्ट्रीय विकासाकरिता ते व्यक्त झालेले
आहे हे सुर्यसत्य आहे.
परंतु त्यांचे विचार
जर्मनीच्या फ्रेडरिक लिस्ट प्रमाणे नाहीत,ज्याने खुल्या व्यापारावर हल्ला चढविला,
संरक्षण वादाचा पुरस्कार केला, जर्मनीच्या लोकांच्या कल्याणा करिता संघर्ष
केला.परंतु लोकांनी त्याला दाद दिली नाही आणि शेवटी आर्थिक विवंचनेने, उपासमारीने
त्यांचे आरोग्य कोसळल्यामुळ त्याने आत्महत्या केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा
सुद्धा राष्ट्रवाद आहे हे आपल्याला व ह्या देशाला आज समजून घ्यावे लागेल. त्यांना
त्यांच्या हयातीमध्ये स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही
मजूरमंत्री,विधीमंत्री,संविधान मसुदा समिती अध्यक्ष,आदी साम्मानाची पदे मिळालीत.
त्यांनी संविधान दिले, सशर्त फाळणी व आरक्षण व्यवस्था सुचवली आणि परंपरागत सामाजिक
सांगाडा मोडीत काढला, हे सर्व करण्यासाठी समाजात खून, दंगलीचे संघर्ष होवू दिले
नाही. त्यांनी राष्ट्राची एकूणच सहमती मिळवली या ठिकाणी असे सहजपणे दिसते कि,
त्यांच्या विचारांचे अनुगमन झाले नाही तर भारतासारख्या कोणत्याही जात्यांध व
दारिद्र्याने पछाडलेल्या राष्ट्रालाच आत्महत्या करावी लागेल! जसे
पाकिस्तान,बांगलादेश आणि इतर आशियाई देशात घडत आहे. आपल्याला हे सत्य मान्य मारावे
लागेल कि भारत देश जिथे हजारो जाती, ना ना धर्म, ना ना पंथ, जातील सर्वच मुख्य
धर्म आणि लाखो भाषा,संस्कृत्या असूनही हा देश आजही अखंडित आहे तो फक्त भारतीय
संविधाना मुळ, बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाही मूळ...!
मित्रहो, भारतातील विकास दर
दिवसेंदिवस द्वीअंकीवर जाते आहे, मात्र भारतीय सामान्य माणूस अनेक आर्थिक
प्रश्नांनी निराश व हताश झालेला आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रथम क्षेत्रात कृषी क्षेत्रातील
लोकांचे आजपर्यंत प्रचंड झालेले शोषण आणि यामुळे हताश शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
गरीब जास्त गरीब होत आहे आणि श्रीमंत जास्त श्रीमंत होत चालला आहे. पैशाचे हे
केंद्रीकरण वेळीच थांबले नाही तर ह्या देशातील गरीब लोकांजवळ आत्महत्ते शिवाय
दुसरा पर्याय उरणार नाही हा इशारा मला ह्या व्यासपीठावरून द्यावा वाटत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या
विचारातील, कृशीला उद्योगाच दर्जा का देण्यात आला नाही हे समजून घेण्यासारखे आहे.
सामाजिक अस्पृश्यतेने,धर्मांधतेने, जातीवादाने पछाडलेले लोक राष्ट्रीय हित जोपासणे
दुय्यम समजतात हि एक देशाला लागलेली कीड होय. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताला
राष्ट्रीयत्वाचे छायाछात्र व पांघरून मिळाले आहे, मात्र त्या खाली चाललेले छुपे
सामाजिक बहिश्करण जे स्वातंत्र्यानंतर सर्वथा निषिद्ध आहे, ते राष्ट्रीय बहिश्करण
होत असल्याची जाणीव आम्हाला नाहीय. राष्ट्रीय बहिष्करणाच्या अभिव्यक्तीला सक्षमपणे
रोखण्यासाठी व वर्तमान काळातील बदलांना सक्षमपणे झेलन्याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे
विचार प्रत्यक्षात आमलात आणणे आवश्यक आहे.परंतु आज हातात असलेली वेळ निघून जाऊ
नये, हि काळाची रास्त अपेक्षा होय !
डॉ.बाबासाहेब आंबेडकर २६
नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात एक ताकीद देतात, ते
म्हणतात “ संविधान कितीही लायक असले तरी त्यांना राबवणारे लोक जर लायक नसतील तर ते
संविधान कुचकामी ठरते, आणि जर त्याला राबवणारे जर लायक असतील तर निकृष्ठ दर्जाचे
संविधानही सर्वोत्कृस्थ ठरते.”
आपल्या राज्यघटनेने
स्वीकारलेल्या लोकशाही बद्दल प्रत्तेक भारतीयांनी अभिमान बाळगावा, परंतु धुंदीत
मात्र राहू नये असे आवाहन बाबासाहेबांनी घटना समितीसमोर केले होते. केवळ राजकीय
लोकशाहीत आपण समाधानी राहता कामी नये. राजकीय लोकशाहीचे सामाजिक आणि आर्थिक
लोकशाहीमध्ये रुपांतर केले पाहिजे. राजकीय लोकशाही हि जर सामाजिक लोकशाहीवर
अधिष्ठित केली नाही तर ती टिकूनच राहणार नाही. कारण लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव
हि एक अखंड आणि अभंग त्रिमूर्ती आहे. जर लोकशाहीत सामाजिक समता नसेल तर ती व्यक्तीच्या
जीवनातील स्वयप्रेरना नष्ट करेल.
बाबासाहेब आपल्या भाषणात
पुढे बोलतात कि “२६ जानेवारी १९५० रोजी आपणाला राजकीय समता लाभेल, पण सामाजिक व
आर्थिक जीवनात असमानता राहील आणि जर हि विसंगती आपण लवकरात लवकर नष्ट करण्याचे
प्रयत्न केले नाही तर ज्यांना विषमतेची आच लागली ते लोक न्यायाच्या अभावी मोठ्या
परिश्रमाने बांधलेला राज्य घटनेचा लोकशाही रुपी मनोरा उध्वस्त केल्याशिवाय राहणार
नाहीत.” भारताची घटना लिहिताना डॉ.बाबासाहेबांवर दुहेरी स्वरुपाची जवाबदारी आली
होती. एकतर देशाच्या सर्वांगीण विकासाच्या, उज्वल भवितव्याच्या दृष्टीने घटना तयार
करावयाची होती, तर दुसरीकडे त्यात अल्पसंख्यांकांच्या, अस्पृश्यांच्या हक्कांचे
सरंक्षण करावयाचे होते. त्यांना राज्यघटना
अशा देशासाठी करायची होती, जिथे भिन्न जाती, भिन्न धर्माचे, भिन्न संस्कृतीचे, भिन्न
संप्रदाय तथा भिन्न भाषेचे लोक एकत्र राहत होते. तरी ते आवाहन बाबासाहेबांनी
स्वीकारले आणि यशस्वीपणे जगातील सर्वश्रेस्ट संविधान दिले.
बाबासाहेबांना हवे तसे
कायदे संविधानामध्ये समाविष्ट करता आले नाहीत. ज्यामध्ये प्रामुख्याने राज्य
समाजवाद, समान दिवाणी संहिता, हवी तशी कार्यपालिका, सामुदायिक शेती,जमिनीचे
राष्ट्रीयकरण, राईट टू वर्क, संपत्तीचा मौलिक अधिकार नाकारणे, एक राष्ट्र एक भाषा
इत्यादी महत्वपूर्ण ऐतिहासिक बदल घडविण्यात बाबासाहेबांना यश आले नाही. तरी पण
बाबासाहेबांनी संविधानात Part.III Art.12-35 जे भारतीय नागरिकांच्या मुलभूत हक्का
बद्दल बोलतात आणि Part IV Art.36-51 जे Directive Principles Of States Policies
बद्दल बोलतात. हे सर्वच Articles भारतीय नागरिकांच्या फक्त मुलभूत हक्काबद्द्लच
बोलत नसून देशाच्या सर्वांगीण विकासाची नांदी घालते. भारतीय संविधानाचे स्पिरीट जर
समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असे जाणवेल कि बाबासाहेबांनी देशाच्या
प्रत्तेक वर्गाच्या हक्कांची काळजी घेतलेली आहे. पण भारतीय लोकांची मानसिकता अशी
आहे कि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना व भारतीय संविधानाला एका हीन दृष्टीने बघितले
जाते हि मोठी शोकांतिका आहे.
बाबासाहेबांची विद्वत्ता आणि
त्यांना जे संविधान अपेक्षित आणि देशातील अल्पसंख्यांक आणि दलित, शोषित,
पिधीतांच्या हक्कांचे रक्षण व्हावे म्हणून त्यांनी आपले सामाजिक आणि आर्थिक विचार आपल्या
अप्रतिम ग्रंथात म्हणजे States And Minorities टाकली. ह्या ग्रंथात बाबासाहेबांनी
आपले आर्थिक विचार आणि देशाची आर्थिक संरचना कशी असावी यावर भर दिला आहे.
बाबासाहेबांनी संपूर्ण देशाचा आर्थिक पुनररचनेचा आराखडा तयार केला होता. एवढेच
नव्हे तर या योजनेचा संबंध राजकीय लोकशाहीच्या स्वरूपात होता हे विशेष. ह्या
आर्थिक योजनेनुसार शेती विकासाच्या बाबतीत बाबासाहेबांनी देशातील संपूर्ण जमिनीचे
राष्ट्रीयकरण करून संपूर्ण देशात सामुहिक शेती पद्धती, सहकारी शेतीपद्धती आमलात
आणण्यासाठी प्रयत्न केले होते. ह्या आर्थिक योजनेद्वारे बाबासाहेबांना देशात राज्य
समाजवाद आणावयाचा होता. ज्यामधून त्यांना भांडवलदार वर्गाची संपत्तीवर अमर्याद
मालकीवर रोक आणून सर्वहारा शोषित जनतेला देशाच्या आर्थिक विकासामध्ये सहभागी करून
घ्यावयाचे होते.
या योजने नुसार शेती हा
शासकीय उद्योग असावा,शेती शासनाच्या मालकीची असावी,किंवा देशातील सर्व जमीन मग ती मालकीची
असो, कुळाची असो किंवा त्याच्याकडे ती गहाण असो, ती ताब्यात घेताना त्या जमिनीचा
योग्य तो मोबदला भू-धारकास देण्यात यावा. राज्याच्या अधिपत्याखाली सामुहिक
पद्धतीच्या शेतीबरोबर कृषी व ओद्योगिक क्षेत्रात संशोधित स्वरुपाची राज्य
समाजवादाची प्रस्तावना मांडली.
शेती हा राज्य उद्योग
असावा, कृषी उद्योगाला राष्ट्रीयकरण करण्यात यावे, पायाभूत मुलभूत उद्योग राज्य
सरकारच्य मालकीचे करावेत. विमा व बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात येवून विमा हि
संपूर्णपणे राज्यसत्तेच्या अधिपत्याखाली असावी, राज्यसत्तेच्या संपूर्ण
नियंत्रणाखाली अर्थव्यवस्थेचे झपाट्याने औद्योगीकरण व्हावे, राज्यातील प्रत्तेक
निमशासकीय नोकरांना त्यांच्या वेतनाच्या प्रमाणात जे विधान सभा निश्चित करेल
त्यानुसार विमा काढण्यास सक्ती करण्यात यावी, मुलभूल व पायाभूत उद्योग राज्य
सरकारच्या मालकीचे करून राज्य हे उद्योग,विमा आणि शेती योग्य भूमीला त्यांच्या
मालकाकडून चालू निर्धारित भावाने कर्ज रोख्याच्या स्वरुपात विकत घेईल. कर्ज
रोख्याची रक्कम रोख स्वरुपात व केंव्हा द्यायची हे राज्यच ठरवेल. अश्या प्रकारे
बाबासाहेब वरील योजनाच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास, अधिक उत्पादन आणि
जनतेच्या प्रत्यक्ष सहभागातून भारताचे नवे भविष्य घडवू इच्छित होते.
बाबासाहेबांनी औध्योगीकरणाचा
जोरदार पाठपुरवा केला होता. त्यांच्या मते लोकशाही म्हणजे अधिक यंत्रे आणि अधिक
औद्योगिकरण व त्यातून अधिक आर्थिक लाभ, असे बाबासाहेबांचे घोष वाक्य होते. त्यांना
ग्रामीण भागातील गावगाडा व बलुतेदारी पद्धती आणि एकूणच ग्रामीण व्यवस्थेची
सामाजिक, आर्थिक संरचना मोडून काढावयाची होती. म्हणून ते गांधीच्या “खेड्याकडे
चला” चरखा सुत कतायी, स्वदेशी चळवळ व विश्वस्ताची कल्पना या विचारसरणीच्या विरोधात
होते. त्यांच्या मते या विचारसरनी मधून ग्रामीण भागाचे ओंगळवाणे चित्र व लाजिरवाणे
जगणेच प्रत्ययास येईल, असे त्यांना वाटत होते.
States And Minorities ह्या
योजनेमधून बाबासाहेबांना केवळ आपल्या देशातील अल्पसंख्यांक आणि अस्पृश्य समाजाच्या
सामाजिक, आर्थिक विकासाचाच समावेश नव्हता, केवळ देशाच्या औद्योगीकरण व शेती
विकासावरच भर दिल्या गेला नव्हता तर या योजनेमधून त्यांना धर्मनिरपेक्षतेचे तत्व
हि आपल्या देशात कायम स्वरूपी रुजवायचे होते हे दिसून येते.
डॉ.बाबासाहेबांच्या
प्रयत्नामुळेच RBI ची रचना झाली. बाबासाहेबांनी जे Hunter कमिशनला सजेशन दिले होते
त्या सजेशनवर आधारितच आजची RBI काम करत आहे हे आपल्याला माहितच असेल. द्वितीय
महायुद्धाच्या काळात म्हणजे १९३९-४५ बाबासाहेबांची भूमिका हि खऱ्या रीतीने
देशभक्तीने ओतप्रोत होती आणि त्यांनी सांगितलेला एक एक शब्द त्या काळात असा खरा
होत होता जसे कि त्यांनी ह्या जगाचेच भवितव्य लिहिले कि काय..!
मित्रहो, अस काय आहे जे बाबासाहेबांना
जगाच्या सर्वच तत्ववेत्याहून एक पाऊल पुढे नेते ? आपण जर जगातील तत्ववेत्त्यांचा
अभ्यास केला तर आपल्याला असे दिसेल कि तथाकथित तत्वज्ञानी त्यांच्या सामाजिक
परिवेशात अत्युच्च पदांवर होते. Plato हा अति श्रीमंत बापाचा मुलगा होता, त्याच्या
वडिलांनी Plato ला चांगले शिक्षण मिळावे ह्यासाठी ते सर्वच केले जो एक वडील करतो.
Aristotal वयाच्या १८व्या वर्षीच Plato Academi मध्ये शिक्षण घेण्यास जातो आणि
वयाच्या ३७व्या वर्षा पर्यंत तिथे शिक्षण घेवून physics, biology, zoology, metaphysics, logic, ethics, poetry, theater, music, ,
politics and government या विषयांचे शिक्षण घेतो आणि सिकंदरला द ग्रेट घडवतो जो स्वतः एक सम्राट होता.
आधुनिक युगात जर आपण नजर टाकली तर आपल्या पुढ एक श्रेष्ठ एकॉनोमिस्ट बघायला भेटतो
तो म्हणजे कार्ल मार्क्स...! तो पण एका श्रीमंत घरात जन्माला आला आणि जर्मनीच्या
बोन आणि बर्लिन विश्वाविध्यालयात त्याने त्याचे
शिक्षण घेतले आणि बरीच पुस्तक लिहिली. त्यात मुख्यता दास कॅपिटल आणि कम्युनिस्ट
मानिफेस्टो हे आहेत. यांच्या व्यतिरिक्त जे युरोपिअन थिंकर्स आहेत जसे जॉन लॉक,
थोमस हॉब्स, इमानुल कान्ट, रुसो, डेविड ह्यूम, मेक्स मुलर, अमर्त्य सेन, मार्शल ह्या सर्वांचे तत्वज्ञान त्यांचा मरणोप्रांत
लोकांनी स्वीकारले आणि प्रत्तेकानी आपापल्या मर्यादेत राहूनच त्यांची फिलोसोफी
समाजापुढ ठेवली. पण बाबासाहेब आंबेडकर एक अस व्यक्तिमत्व आहे ज्यांनी एका अस्पृश्य
घरात जन्म घेवून, शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेतले, दररोज जनावरापेक्षा हीन अशी व्यवस्था झेलून
सुद्धा ह्या देशातच कुणी ईतके शिक्षण घेतले नाही तितके बाबासाहेबांनी घेतले. एवढेच
नव्हे तर त्यांनी ह्या देशाला एक नवीन दिशा दिला, एक नवीन भविष्य दिले. हजारो
वर्षापासून चालत आलेल्या मानसिक, शारीरिक गुलामगिरीला मुळापासून उपटुन फेकले. आणि
ते सुद्धा रक्ताचा एकही थेंब न सांडवता...! आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर जगाच्या
त्या सर्व तत्ववेत्त्यांच्या तुलनेत एक पाऊल पुढ निघून जातात..! त्यांच्या
भविष्याला छेद देणाऱ्या ज्ञानाला जगातच तोड नाही हे विदित आहेच. आणि म्हणूनच
कोलंबिया विश्वविद्यालयाने त्यांना “सिम्बॉल ऑफ नॉलेज” असे संबोधले आहे. हे
भारतासाठी गर्वाची बाब असूनही ह्या देशाची मानसिकता त्यांना आजही एक दलित नेता
म्हणूनच हिणावते हि मोठी शोकांतिका आहे.
मित्रहो, आज वेळ आलेली आहे
कि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार समजून समाज आणि देशाच्या प्रगती साठी ते
कशे पूरक आहेत हे संपूर्ण देशाला पटवून सांगावे लागेल.तरच ह्या देशाला आपण एक नवीन
दिशा मिळेल...तरच ह्या देशात समता,स्वतंत्रता,बंधुता आणि न्याय नांदेल...!
भारतातील सामाजिक, राजकीय,
धार्मिक, सांस्कृतिक तथा आर्थिक गुलामगिरीच्या अन्यायी पाशातून कोट्यावधी
शोषितांची आणि अल्पसंख्याकांची मुक्ती करणारा आणि समस्त मानव मुक्तीच्या लढ्यातून
शोषितांच्या अंतकरणात आपल्या कृतीतून क्रांतिकारी विचार पेरणाऱ्या एका परिवर्तनशील
क्रांतिकारी संघर्षाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आपल्या सर्वांनाच
देशाच्या ह्या महान सापुताचा अभिमान वाटायला हवा.
No comments:
Post a Comment